मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा ४० पार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 106 Views 3 Min Read
3 Min Read
Mumbai, Madhya Maharashtra, Marathwada and Vidarbha with mercury below 40 par

मुंबई: राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीनही विभागांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपलीकडे नोंदले गेले. मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांहून अधिक असल्याची नोंद झाली. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने उष्णतेच्या लाटेचा सामना करत मुंबईकर इच्छित स्थळी पोहोचले. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

सांताक्रूझ येथे रविवारी ३८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ४.८ अंशांनी अधिक होते. राज्यभरात ४०च्या पुढे तापमानाचा पारा पोहोचला असताना सांताक्रूझ येथील कमाल तापमान आणि सरासरी तापमान यातील तफावत सर्वाधिक होती. मुंबईत रविवारी काही भागांमध्ये ४०हून अधिक तापमानाची जाणीव झाली. भारतीय हवामान विभागाची स्वयंचलित केंद्रे तसेच महापालिकेची नोंद यावर पूर्व उपनगरांमध्ये तापमानाचा पारा अधिक असल्याचे समोर आले.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित केंद्राच्या नोंदीनुसार, विक्रोळी येथे ४५.२, कोपरखैरणे येथे ४३.१, राममंदिर येथे ४३.६, विद्याविहार येथे ४०.४, माटुंगा येथे ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या वातावरणाशी सामना करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी रविवारी एसी लोकल, एसी टॅक्सी यांचा अधिक वापर केला. कोरड्या, उष्ण झळांनी हैराण झालेले मुंबईकर वाऱ्याची झुळूक कधी येते या प्रतीक्षेत होते. मात्र हे वारेही उष्ण झळांचीच जाणीव अधिक करून देत होते.

- Advertisement -

आज, सोमवारीही ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारप्रमाणेच उष्णतेची लाट अनुभवायला येऊ शकते, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. या तीनही जिल्ह्यांत उद्या, मंगळवारीही वातावरण उष्ण आणि आर्द्रतायुक्त असेल असा अंदाज आहे.

वातावरण बदलामुळे उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढत असल्याचे पर्यावरण अभ्यासक केदार गोरे यांनी सांगितले. यामध्ये शहरात झालेले काँक्रीटीकरण भर घालत आहे. या काळामध्ये शहरातील पाणथळ जागा टिकवणे आवश्यक आहे. पाणथळ जागा ही सर्वांत दुर्लक्षित परिसंस्था आहे. पाणथळ जागा टिकल्या तर उष्णतेच्या लाटेची परिणामकारकता काहीशी कमी होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कोकण विभाग वगळता भारतीय हवामान विभागाच्या बहुतांश केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा ४०हून अधिक होता. सोलापूर येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान रविवारी नोंदले गेले. महाबळेश्वर येथे ३४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. महाबळेश्वर आणि कुलाबा येथील कमाल तापमानात रविवारी केवळ ०.३ अंशांचा फरक होता. विदर्भात पावसाच्या परिणामाने गोंदिया, नागपूर येथे कमाल तापमानात घट झाली. अमरावती, वर्धा, बुलडाणा येथील कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास होते. तर इतर केंद्रांवर ४०हून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

Share This Article