श्रेयस, शुभमन आणि अक्षर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताचा विजय

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 13 Views 2 Min Read
2 Min Read

नागपूर : भारताने नागपूरमध्ये इंग्लंडचे नाक कापले. भारताने संपूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले. हर्षित राणाने तीन विकेट्स घेत इंग्लंडला सुरुवातीला धक्के दिले, त्यानंतर इंग्लंडवर अंकुश ठेवण्याचे काम रवींद्र जडेजाने २६ धावांत तीन विकेट्स घेत केले. त्यामुळे भारताला इंग्लंडला २४८ धावांत ऑल आऊट करता आले. भारतीय संघाची विजयी आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली नाही. कारण भारताने दोन्ही सलामीवीर फक्त १९ धावांत गमावले होते. पण त्यानंतर श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने चार विकेट्स राखत सहजपणे विजय साकारला. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून त्यांनी मालिका विजयाची सुरुवात केली आहे. शुभमन गिलने या सामन्यात १४ चौकारांच्या जोरावर ८७ धावांची दमदार खेळी साकारत भारतच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisement -

रोहित शर्मा २ धावांवर बाद झाला, तर यशस्वी जयस्वाल १५ धावा करू शकला. त्यावेळी इंग्लंडचा संघ भारताला बॅकफूटवर ढकलण्याच्या तयारीत होता. पण त्यावेळी श्रेयस अय्यर भारताच्या मदतीला धावून आला. कारण श्रेयसने त्यानंतर तुफानी फटकेबाजी करत आपले अर्धशतक झळकावले आणि संघाला पराभवाच्या छायेमधून बाहेर काढले. श्रेयसने ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. श्रेयस ५९ धावा करून बाद झाला असला तरी तो त्याचे काम करून गेला. श्रेयसने भारताच्या विजयाचा पाया रचला. शुभमन गिल आणि अक्षर पटेल या दोघांनी त्यावर कळस चढवला. अक्षर पटेलने ५२ धावांची खेळी करत गिलला चांगली साथ दिली. गिलने अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत असताना भारताने विजय साकारला.

- Advertisement -

इंग्लंडला दमदार ७५ धावांची सलामी मिळाली होती. त्यामुळे इंग्लंड या सामन्यात सहज ३०० धावांचा डोंगर उभारेल, असे वाटत होते. पण फिल सॉल्ट बाद झाला आणि इंग्लंडला एकामागून एक धक्के बसायला सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने ५२ धावांची खेळी साकारत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण बटलर बाद झाला आणि संघाचा डाव गडगडला. त्यामुळेच इंग्लंडला यावेळी २४८ धावांत आपले सर्व फलंदाज गमवावे लागले.

- Advertisement -

भारताकडून यावेळी हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. अक्षर पटेलने जोस बटलरचा एकमेव बळी मिळवला खरा, पण तोच भारतासाठी महत्वाचा ठरला. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनीही यावेळी प्रत्येकी एक बळी मिळवला.

Share This Article