देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 7 Views 2 Min Read
2 Min Read

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांची अधिवेशनातील एंट्रीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये चैतन्य संचारले होते. विधानसभेत ते सत्तापक्षाच्या बाकांवर बसलेत. त्यामुळे अजितदादांनी ही लढाई जिंकल्याचा विजयीभाव त्यांच्या गटात दिसून आला. नवाब मलिक तेव्हादेखील मौन होते. पहिल्या दिवशी त्यांनी कुठल्याही गटात नाही तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. पण, सत्तापक्षाच्या बाकावर बसून त्यांनी स्वत:च्या कृतीतून त्यांची बाजू स्पष्ट केल्याचे चित्र होते. त्यावर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ‘देशद्रोहाचे आरोप असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का,’ असा सवाल केला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राने राजकीय भूंकप झाला. त्या पत्राचे पडसाद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर पडल्याचे शुक्रवारी दिसून आले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले,‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र जाहीर झाले नसते तर बरे झाले असते. मित्रपक्ष म्हणून यासंदर्भात चर्चा करायला पाहिजे होती. आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला, असे म्हणण्याचे काहीही कारण नाही.’

- Advertisement -

आमदार नवाब मलिक यांना कुठे बसू द्यावे, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. काल नवाब मलिक वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आलेत. त्यानंतर ते सहकाऱ्यांशी भेटलेत. मात्र, ते कुठल्या गटात आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी यावर भाष्य करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

- Advertisement -

फडणवीसांच्या लेटरबॉम्बवर बोचरी टीका करताना काँग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,‘भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे; हे या पत्रावरून स्पष्ट होते.’ त्यांनी खासगीत पत्र लिहीणे शक्य होते, ते जाहीर करण्याची गरज नव्हती, असेदेखील ते म्हणाले.

Share This Article