तलाठी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 28 Views 3 Min Read
3 Min Read

औरंगाबाद : राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्राताल कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये  उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला 5 सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, रा. कातराबाद, औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, नागरेला पोलिसांनी अटक करताच थेट मंत्रालयातून पोलिसांना फोनाफानी सुरु झाल्याने, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांत परीक्षा घोटाळ्याचा औरंगाबाद आता केंद्रबिंदू बनला आहे. कधी पोलीस भरती, तर कधी वन विभागाच्या घोटाळ्यात औरंगाबादचे नाव समोर आले. त्यात आता औरंगाबादचं कनेक्शन थेट तलाठी घोटाळ्यात देखील समोर आले आहे. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या तलाठी भरती परीक्षेत शहरातील  आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित राजू नागरेला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे मास्टर कार्डसह, दोन मोबाईल मिळाले होते. तसेच त्याच्या मोबाईलमधील टेलिग्रामवर काही प्रश्नांचे छायचित्र होते. नागरे हा परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घरून आतमध्ये कॉपी पुरवत होता. यासाठी तो या कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपये देत होता. मात्र, संशय आल्याने परीक्षा केंद्राबाहेर उभा असलेल्या नागरेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. या सर्व प्रकरणात एकूण 7 आरोपी आहेत.

- Advertisement -

नागरेसाठी थेट मंत्रालयातून फोनाफानी…

मागील काही दिवसांत वेगवेगळ्या भरती परीक्षेत होणारे गैरप्रकार वाढले आहेत. या प्रकरणी अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. थेट परीक्षा केंद्रातील कर्मचारीच या सर्व घोटाळ्यात सहभागी होत असल्याने खळबळ उडाली आहे. तर या सर्व प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा आरोप होत असतानाच, आता मंत्रालय कनेक्शन देखील समोर येत आहे. औरंगाबाद पोलिसांनी कॉपी पुरवणाऱ्या नागरेला ताब्यात घेतल्यावर त्यासाठी थेट मंत्रालयातून पोलिसांना फोन येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

परीक्षा केंद्रातील कर्मचारीच घोटाळ्यात सहभागी…

औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसी भागात टीसीएस कंपनीमार्फत आय ऑन डिजिटल हे परीक्षा केंद्र चालवले जाते. या केंद्रात राज्य आणि केंद्राच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात. दरम्यान याठिकाणी अनेक कर्मचारी शिफ्टनुसार काम करतात. मात्र, आता हे केंद्र कॉपीच्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी वनरक्षक भरतीत याच टीसीएस केंद्रातील कर्मचारीच बाथरूममध्ये कॉपी पुरवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता तलाठी भरतीत देखील राजू नागरेला टेलिग्रामद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवण्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहेत.

Share This Article