मुंबई : रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.
- Advertisement -
अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वृद्धापकाळासंबंधी इतर आजार होते. मागील १२ वर्षांपासून ते पाठीच्या दुखण्याने त्रस्त होते. त्यामुळेच त्यांना चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. अखेर २० फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
- Advertisement -
रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास ४२ वर्ष त्यांच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ ने अनेक रेकॉर्ड मोडित काढले होते. अमीन सयानी यांना १९५२ मधील गीतमाला शोमधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यावेळी हा नंबर वन शो होता. १९५२ ते १९९४ पर्यंत शो तुफान गाजला. नंतर २००० ते २००१ आणि २००१ ते २००३ पर्यंत काही बदल करुन शो पुन्हा टेलीकास्ट करण्यात आला होता. त्यांच्या आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.
- Advertisement -
अमीन सयानी यांच्या नावे तब्बल ५४ हजारहून अधिक रेडिओ कार्यक्रम प्रोड्यूस करणं, त्याला आवाज देण्याचा रेकॉर्ड आहे. त्याशिवाय जवळपास १९ हजार जिंगल्सला आजाव देण्यासाठीही अमीन सयानी यांचं नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं आहे.
४० ते ४५ वर्षांपूर्वी मुंबईतील रेडिओ स्टूडिओमध्ये बिग बी ऑडिशन देण्यासाठी पोहोचले होते. पण अमिताभ बच्चन त्यांच्या भेटीची वेळ न घेताच त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळेच सयानी यांनी बिग बींना भेटण्यास नकार दिला होता आणि बिग बींचा आवाज न ऐकताच त्यांना रिजेक्ट केलं होतं.