नाशिक: ‘मराठा ओबीसीत आल्यामुळे ओबीसींच्या संख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही पूर्वीपासून त्यांच्यातच आहोत. आमचं वावर सध्या त्यांच्याकडे आहे ते आम्ही आता परत मागत आहोत. छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या उपकारांची जाणीव ठेवून परतफेड करावी,’ असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी येथे केले.
- Advertisement -
जातीच्या वेदना बोलत आहे, कोणी विरोधात गेले तर त्यांना सुट्टी नाही. ४० दिवसांत आरक्षण मिळविणारच, असा निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले जरांगे यांनी गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर संवाद साधला. राज्यातील इतर भागातील मराठ्यांकडे कुणबीचे पुरावे नसल्याने त्यांची अडवणूक होतेय, या प्रश्नांला उत्तर देताना जरांगे म्हणाले, की संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळणार आहे. मग ते कोणत्याही भागातील असोत. सरकार दोन प्रकारचे मराठे आहेत, असा फरक करू शकत नाही. मराठ्यांनी एकविचाराने राहायला हवे. मराठे आंदोलनात सहभागी झाले नाहीत, तर त्यांना बळ मिळेल, असे सांगताना जरांगे म्हणाले, की सरकार लय डाव टाकत असते, ते काही करू शकतात. त्यामुळे आम्ही सावध आहोत. मराठा समाज भोळा आहे, मलाही त्या घोळात टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. पण, आम्ही त्यात सापडणार नाही. आता मराठ्यांत फूट पडणार नाही, आम्ही सावध आहोत. बैल चोरीला जाण्यापूर्वी तो बांधला आहे. आपली जात आपण जागी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
- Advertisement -
जरांगे म्हणाले…
- ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगत आहेत ते योग्यच
- आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहोत, आमचंच आम्हाला द्यायचं आहे
- यापूर्वी जे आम्हाला दिलं गेलं नव्हतं, ते आता आम्ही मागतोय
- त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही
- आम्हीही मागास असल्याचे सिद्ध झाले आहे
- भुजबळांनी गैरसमज दूर करून गरीब मराठ्यांना आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा
- आम्ही पूर्वीपासून कुणबी मराठे आहोत याचे पुरावे समितीला सापडले आहेत
- कायद्यासाठी जो आधार हवा होता तो दिला आहे
- कुणबी जात प्रमाणपत्रावर आम्ही ठाम आहोत आणि तो आम्ही मिळविणारच