रांची : चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला धुळ चारत दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही जिंकली आहे. कारण पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने हा सलग तिसरा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. पण त्याला विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. पण भारताच्या शुभमन गिलने ही जबाबदारी चोख पार पाडली आणि भारताला पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला. रोहित शर्माने यावेळी ५५ धावांची खेळी साकारली, तर शुभमन गिलने नाबाद ५२ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
- Advertisement -
भारतीय संघ चौथ्या दिवसाची सुरुवात कशी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण पहिल्या अर्ध्या तासात सामन्याला कल ठरणार होता. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. यशस्वी यावेळी संयतपणे खेळत होता, पण रोहित मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांना ऐकत नव्हता. कारण रोहितने यावेळी जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली होती. जेम्स अँडसरनला ११ व्या षटकात खणखणीत षटाकर खेचत रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले. यावेळी रोहित शर्माचे बेन स्टोक्सेही कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा आता काही थांबणारा नव्हता, हे स्पष्ट झाले होते. पण त्याचवेळी भारताला धक्का बसला तो यशस्वी जैस्वालच्या रुपात. यशस्वीचा अप्रतिम झेल यावेळी जेम्सने पकडला. रुटच्या गोलंदाजीवर यशस्वी हा ५ चौकारांनिशी ३७ धावा करून बाद झाला.
- Advertisement -
यशस्वी बाद झाला तरी रोहित आपल्या लयीत खेळत होता. रोहितने यावेळी आपले अर्धशतक साकारले. रोहित आता मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण यावेळी एक मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. टॉम हार्टलीला मोठा फटका मारण्यासाठी रोहित पुढे सरसावला, पण त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे गेला आणि रोहित यष्टीचीत झाला. रोहितने यावेळी पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाला आणि त्यानंतर आलेला रजत पाटीदार एकही धाव न करता बाद झाला. पण त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांनी चांगलाच किल्ला लढवला.