आयुष्य अतिशय क्षणभंगूर आहे. आत्ता हसता-खेळता असणाऱ्या माणसाचं पुढल्या क्षणी काय होईल, याची कोणालाही कल्पना नसते. पण असा एक हादरा बसतो की आपण सुन्न होतो. अशीच एक मन हेलावणारी , हृदयद्रावक घटना मुंबईच्या भाईंदर परिसरात घडली आहे. आईच्या वाढदिवसाच्या दिवशीच चिमुकल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वाढदिवस साजरा करण्यासाठी ही महिला तिचा पती, मुलगी आणि लहान मुलासह बाहेर फिरायला जात असतानाच हा अपघात झाला आणि 11 महिन्यांच्या चिमुकल्याने जीव गमावला. शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- Advertisement -
25 नोव्हेंबर रोजी शाह यांच्या पत्नीचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने शहा, त्यांची पत्नी, पाच वर्षांची मुलगी आणि ११ महिन्यांचा मुलगा हे सर्व जण बाहेर जाणार होते. गोराई बीचवरील एका रिसॉर्टमध्ये सहकुटुंब वाढदिवस साजरा करण्याचा प्लान त्यांनी आखला.जवळच जायचं असल्याने त्यांनी स्कूटीवरून जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी 4 च्या सुमारास ते स्कूटीवरून निघाले. शहा हे स्कूटी चालवत होते, त्यांची छोटी मुलगी पुढे उभी होती, तर शहा यांची पत्नी, लहान मुलाला मांडीवर घेऊन मागे बसली होती.
- Advertisement -
उत्तन रोड येथील सुरभी हॉटेलजवळून जात असताना, रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची स्कूटी दुचाकी घसरली. त्यामुळे शहा यांच्या पत्नीच्या हातून त्यांचा मुलगा खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला दुखापत झाली. आणि त्याचा तेथेच मृत्यू झाला. याप्रकरणात भाईंदर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये शहा दाम्पत्य आणि त्यांची मुलगी जखमी झाले आहेत, अशी माहिती भाईंदर पोलीसांनी दिली.