मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन भाष्य केले. आता अशोक चव्हाणही काँग्रेस आमदारांचा गट फोडून संपूर्ण पक्ष आणि हात या चिन्हावर दावा करणार का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते, आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.