माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. आज त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
- Advertisement -
38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून मी आज माझ्या नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी आम्हाला सकारात्मक साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली आहे.
- Advertisement -
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत
आज भारतीय जनता पक्षासाठी आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व, विधानसभा-लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रिपदं ज्यांनी भूषवलं, दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं, असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
- Advertisement -
अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचं काम करायचं आहे. त्यांनी प्रवेश करताना आपल्याला पदाची कुठलीही अपेक्षा नाही, विकासाच्या मुख्यधारेत काम करण्याची संधी द्या, असं सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अशोक चव्हाण यांना भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी चेंडू टोलावून दिला. अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची, याची आम्हाला बरोबर माहिती आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा करुन घेऊ, असंही फडणवीस म्हणाले.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
मी राजकीय आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. मी भाजप प्रवेशावेळी कुठलीही मागणी केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचं काम करण्याची माझी इच्छा आहे. आजपासूनच सकारात्मक पद्धतीने काम करायला सुरुवात करत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, आशिष शेलार यांचा उल्लेख करताना अशोक चव्हाण यांनी अनवधानाने मुंबई भाजप ऐवजी मुंबई काँग्रेस असा केला. त्यांची चूक लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सुधारली, त्यासरशी व्यासपीठावर उपस्थित भाजप नेत्यांसह खुद्द अशोक चव्हाण आणि कार्यकर्ते-पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. पहिलाच दिवस आहे. स्वीच व्हायला वेळ द्या, असं मिश्कील भाष्य करत अशोक चव्हाणांनी वेळ मारुन नेली.