नवी दिल्ली- यूपीएच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीवर मोदी सरकार श्वेतपत्रिका आणणार आहे. यावर उत्तर म्हणून काँग्रेसने एनडीएच्या १० वर्षांच्या काळातील कामगिरीचे ब्लॅक पेपर आणण्याच्या निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या ब्लॅकपेपरमध्ये मोदी सरकारमध्ये लोकांना आलेल्या अडचणी, आर्थिक समस्या यांचा पाढा असणार आहे.
- Advertisement -
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यकाळातील ब्लॅकपेपर आणण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात आलेल्या अडचणी लोकांच्या समोर ठेवल्या जाणार आहेत. सर्व राज्यांमध्ये भेदभाव होत आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांना दुर्लक्षित केले जात आहे. मोदी सरकार लोकांना खरी माहिती देत नाहीये.
- Advertisement -
बेरोजगारीचा विषय भाजप टाळत आहे. आतापर्यंत किती लोकांना रोजगार मिळाला आहे? महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ते नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यासोबत तुलना करत आहेत. आज आपण काय उपाय करत आहात ते सांगा? हे महत्त्वाचं आहे. महागाई कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं ते सांगा. काँग्रेसला शिव्या द्या, पण महागाई नियंत्रणात आणा, असा घणाघात खरगे यांनी केला.
- Advertisement -
अंतरिम बजेट सादर करत असताना निर्मला सीतारमण यांनी यूपीए सरकारच्या १० वर्षाच्या कार्यकाळातील श्वेत पत्रिका काढण्याचे जाहीर केले आहे. यूपीएच्या काळात भारताची आर्थिक स्थिती काय होती हे लोकांसमोर मांडण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे.