बंगळुरू: कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विजयपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या पाटील यांनी आपल्याच पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मला पक्षातून काढलं तर पैशांची लूट करणाऱ्या, त्यातून मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची नावं जाहीर करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.
- Advertisement -
येडियुरप्पा सरकारच्या काळात ४० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा आमदार पाटील यांनी केला. करोना काळात मोठ्या प्रमाणात अपहार झाला. प्रत्येक रुग्णाचं ८ ते १० लाखांचं बिल करण्यात आलं, असं पाटील म्हणाले. ‘करोना संकट आलं तेव्हा आमचं सरकार होतं. पण त्यानं काही फरक पडत नाही. चोर तो चोरच. करोना काळात येडियुरप्पा सरकारनं ४५ रुपयांच्या मास्कची किंमत ४८५ रुपये ठेवली. बंगळुरुत १० हजार बेड्सची व्यवस्था होती. त्यासाठी भाड्यानं १० हजार बेड्स मागवले गेले. मलाही करोना झाला होता. त्यावेळी मणिपाल रुग्णालयानं ५ लाख ८० हजार रुपये मागितलं. गरीब माणूस इतके पैसे कुठून आणणार?’, असा सवाल पाटील यांनी विचारला.
- Advertisement -
आमदार पाटील यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सरकारच्या काळात ४० टक्के कमीशन घेतलं जातं. आम्ही याबद्दलचे पुरावेदेखील दिले. आता पाटील यांच्या आरोपानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पाटील यांनी केलेले आरोप लक्षात घेता येडियुरप्पा यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार आम्ही लावलेल्या अंदाजाच्या १० पट मोठा आहे. आम्ही विधानसभेत आरोप केल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांचा एक गट गदारोळ करत सदनाबाहेर गेला होता. तो गट आता कुठे लपून बसला आहे, असा सवाल सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.
- Advertisement -
देश केवळ पंतप्रधान मोदींमुळे वाचला आहे, असं पाटील म्हणाले. राज्यातील पक्ष नेतृत्त्वानं मला नोटिस द्यावी आणि मला पक्षातून काढण्याचा प्रयत्न करुन पाहावा. मी सगळ्यांना उघडं पाडेन. प्रत्येक जण चोर झाला, तर मग राज्य आणि देशाला कोण वाचवणार? देश पंतप्रधान मोदींमुळे वाचला आहे, असं पाटील म्हणाले.