ठाणे : कधी कोयता गँगची दहशत तर कधी बिझनेसकडून बायको-मुलाची हत्या. गुन्ह्याच्या विविध आणि हादरवणाऱ्या घटनांमुळे कल्याण शहर गेल्या काही दिवसांपासून बरंच चर्चेत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. कल्याणमधीलच कोळसेवाडी परिसरात एका पान टपरी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना ताजी असतानाच आता असाच एक आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- Advertisement -
कल्याण पश्चिम येथे भररस्त्यात एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून हजारो रुपयेही लुटण्यात आले. नीरज भोलानाथ यादव असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा अंबरनाथ येथील रहिवासी आहे. या घटनेप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
- Advertisement -
नीरज हा मूळचा अंबरनाथ असून कल्याणमध्ये कॉलेजसाठी येतो. मंगळवारी रात्रीच्या सुमारासा तो घरी जायला निघाला, शहाड जकात नाका येथे तो रिक्षाची वाट बघत होता. मात्र तेवढ्यात तिथे तिघेही आरोपी आले आणि त्यांनी जबरदस्तीने नीरजला त्यांच्या बाईकवर बसवले. नीरज तिथे एकटाच असल्याने तो विशेष प्रतिकार करू शकला नाही. आरोपींनी त्याला जबरदस्तीने म्हारळ गावाजवळील टेकडीवर नेले आणि तेथे त्याला बेदम चोप दिला.
- Advertisement -
एवढचं नव्हे तर तीनही आरोपींनी त्याला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि नीरज याच्याकडे असलेले डेबिट कार्ड ताब्यात घेऊन जवळच्याचा एटीएममधून पैसे काढले. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि पाकिटातील रोख रक्कमही आरोपींनी हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. हल्लेखोरांच्या ताब्यातून सुटल्यावर नीरजने कसंबसं महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं आणि तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार कथन करत तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहै.