गडचिरोली : संपत्तीच्या वादातून नातीसह आजी-आजोबांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी येथे घडली. पीएलजीए सप्ताह सुरू असल्याने या घटनेचा माओवाद्यांशीही संबंध असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
- Advertisement -
देवू दसरू कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५) व अर्चना रमेश तलांडे (१०), अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अर्चना ही देवू यांच्या मुलीची मुलगी होती. ती एटापल्ली तालुक्यातील मरकल येथील राहणारी होती. ती सुट्टीत आजी-आजोबांकडे आली होती. बुधवारी हे तिघेही गावाजवळच्या शेतात रात्रीपासून मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी एका ग्रामस्थाला त्यांची हत्या झाल्याचे दिसले. त्याने तत्काळ गावकऱ्यांसह बुर्गीच्या (कांदोळी) पोलिसांना माहिती दिली. अर्चनाच्या चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत; तर देवू आणि बिच्चे या दोघांना हातोडीने वार करून ठार मारण्यात आले आहे. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. ही हत्या नेमकी कुणी केली, संपत्तीचा नेमका वाद काय होता किंवा कुणासोबत होता याविषयीचा पोलिस तपास करीत आहेत.
- Advertisement -
‘ही घटना संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. योग्य तो तपास करून आरोपींना जेरबंद केले जाईल,’ अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.