सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची चाहूल लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा ताळेबंद आखून पुढील पावलं टाकणं गरजेचं असल्याचं मत आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पाटील यांनी व्यक्त केलं. राज्य सरकारनं आतापासूनच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याबाबत नियोजन करणं गरजेचं असल्याचीही सूचना त्यांनी केली. एबीपी माझानं त्यांची संपर्क साधला, त्यावेळी ते बोलत होते.
- Advertisement -
दुग्ध व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता
सध्या राज्यातील अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळं खरिपाचं पीक वाया जाण्याची भीती आहे. पावसानं ओढ दिल्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. पावसाच्या या पार्श्वभूमीवर 100 टक्के पीक वाचवण्यासाठी प्रयत्न न करता काही पीक सोडून द्यावं लागेल असे पवार म्हणाले. पिण्याचं पाणी, जनावरांच्या चारा पिकासाठीचं पाणी आणि फळबागा वाचवण्यासाठी लागणारं पाणी याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितलं. सरकारनं आतापासूनच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याबाबत नियोजन करणं गरजेचं आहे. ही खबरदारी न घेतल्यास, जनावरांच्या चाऱ्याच्या किंमती ऐनवेळी गगनाला भिडतील अशी भीती पोपटराव पवारांनी व्यक्त केली आहे.
- Advertisement -
अपुऱ्या पावसामुळं खरीपाची पीकं वाया जाण्याची भीती
राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अने जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आमि कोकणात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हातची पीकं वाया जाण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळं राज्यात पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पाणीटंचाईचं संकट आल्यास शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळं या संकटापूर्वीच शेतकऱ्यांमी पाण्याचं आणि चाऱ्याचं योग्य ते नियोदन करणं गरजेचं आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली. मात्र, या चालू ऑगस्ट महिन्यात पावसानं चांगीच दडी मारली आहे. पावसाच्या या स्थितीमुळं शेतकऱ्यांची मका, कापूस, सोयाबीन, मूग , बाजरी, तूर पीकं करपू लागली आहेत. खरिपाचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.